विज्ञान सर्वांसाठी -८

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. हे माझं आठवं आणि शेवटचं व्याख्यान.

ऐका…

मात्र तुम्हाला हे व्याख्यान वाचायचं असेल तर तुम्ही ते इथेच वाचू शकता. ते भाषण लिखित रूपात पुढे दिलं आहे.

सम्यक तंत्रज्ञान

विज्ञान तंत्रज्ञान आणि गणित यांचा सोप्या शब्दांत वेध घेताना, मी विज्ञान-तंत्रज्ञानाचं कौतुक केलं, त्याच्या दोष आणि मर्यांदांचा विचारही केला. त्याला मानवी चेहरा आणण्यासाठी जो तोल साधायला हवा त्याचा विचार आज मी तुमच्या समोर मांडणार आहे.
सामान्य माणसाला विज्ञान जाणवतं ते त्याच्या सुखसोयींसाठी असणाऱ्या यंत्रांमुळे. ती यंत्र बनवण्यासाठीचं जे तंत्रज्ञान, ते समतोल असेल तर ते मानवजातीच्या हितासाठी काम करेल. अशा तंत्रज्ञानाला मी सम्यक तंत्रज्ञान म्हणतो. काय आहे हे सम्यक तंत्रज्ञान ?

सम्यक म्हणजे काय

सम्यक हा शब्द तथागत बुद्धांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वापरला. त्यांनी सांगितलेल्या आठही धर्ममार्गांमागे विशेषण लावलं आहे सम्यक. सम्यक म्हणजे समतोल साधणारं. तंत्रज्ञान हे लोकांसाठी आहे, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आहे हे गृहीत धरलं तर तंत्रज्ञानानं आज ताळतंत्र सोडलं आहे हे दिसून येईल. आजारापेक्षा उपाय भयंकर अशी आज तंत्रज्ञानाची स्थिती झाली आहे.

एक उदाहरण घेऊया. आजचं इंटरनेट, मुख्यतः बड्या कंपन्यांना, जगभरात कुठेही कारखाने क्षणात चालू बंद करता यावेत यासाठी महत्वाची भूमिका बजावतं. कारखाने चालवायचे किंवा नाही हा निर्णय त्या ठिकाणी कंपनीला नफा होतो की नाही या एकाच गोष्टीशी निगडित असतो. लक्षात घ्या की हा नफा अब्जावधींच्या घरात असतो.
या तुलनेत इंटरनेटवर आपल्याला ज्या काही तथाकथित मोफत सोयी मिळतात त्या म्हणजे कुत्र्यापुढे टाकलेले शिळ्या पावाचे तुकडे असतात. जेव्हा कारखाना बंद होतो, किंवा यंत्रमानवांची संख्या वाढते, तेव्हा हजारोंनी लोक बेकार होतात, आणि त्यांचं जीवन उध्वस्त होतं. या गोष्टीचं या कंपन्यांना काहीही घेणंदेणं नसतं.

तंत्रज्ञान जर लोकांसाठी असेल तर ही बेकारी, बेचैनी टळेल.

आम्हाला इंटरनेटही हवं आणि बेकारी देखील नको.
आम्हाला इंटरनेट हवं पण आमचा मेंदू मात्र खोट्या माहितीनं धुतला जाऊ नये. असा समतोल साधू शकेल ते तंत्रज्ञान म्हणजे सम्यक तंत्रज्ञान. केवळ इंटरनेटच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रांत आपण ही अपेक्षा बाळगली पाहिजे.

 

संगणक आणि सम्यक तंत्रज्ञान

संगणक हा मानवी बुद्धिमत्तेचं वाढीव रूप आहे, extension आहे. त्याचा उपयोग केवळ एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी नाही. केवळ व्हिडिओ पहाण्यासाठी नाही. लोकांनी साचवलेली खरी-खोटी माहिती केवळ search करण्यासाठी नाही. कॉपी पेस्ट संस्कृती रुजवण्यासाठी तर नाहीच.

जिथे माणूस कमी पडतो तिथे संगणक मदत करतो. एक उदाहरण पाहूया. किचकट गणितं सोडवण्यासाठी पूर्वी कॅल्क्युलेटर वापरून देखील खूप वेळ लागत असे. ही गणितं आता संगणकाच्या मदतीनं चटकन सोडवता येतात. एखादी गोष्ट प्रत्यक्ष तयार करण्याआधी त्याचं गणिती प्रतिमान वापरून त्या गोष्टीच्या वर्तनाचं अचूक भाकित करता येतं.

माणसानं संवाद किंवा करमणुकीसाठी संगणक वापरू नये असा याचा अर्थ नाही. गप्पाटप्पा, विश्रांती, करमणूक यावर माणसाचा हक्क आहेच. पण हे करत असताना त्याच्या खाजगी माहितीची चोरी होऊ नये. आणि ती माहिती वापरून कंपन्यांनी स्वतःच्या तुमड्या भरू नयेत. यासाठी सम्यक तंत्रज्ञान जागरूक रहातं. तो मार्ग आहे मुक्त संगणकीय प्रणालींचा. या प्रणाली त्यांच्या कार्य करणाऱ्या तर्कमाला सर्वांसाठी खुल्या करतात, त्यामुळे आपण बनवले जात नाही याची आपण खात्री करून घेऊ शकतो.

सम्यक तंत्रज्ञानाचा आणखी एक अर्थ

सध्याचं तंत्रज्ञान ऊर्जेची उधळपट्टी करतं आहे, वस्तूंचा पूर ग्राहकांपर्यंत नेतं आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते. निसर्गावर हल्ला होतो आहे. कट्टर पर्यावरणवादी त्यासाठी तंत्रज्ञानच नाकारतात. पण बैलगाडीच्या युगात पुन्हा जायचं नाहीच ही सम्यक भूमिका आहे. सम्यक तंत्रज्ञान हा तोल देखील संभाळतं. प्रगत तंत्रज्ञान नाकारायचं नाही. पण स्वीकारायचं ते आपल्या अटींवर. या अटी, आणि गृहीतकं अशी आहेतः-

  • शरीरकष्ट शून्यावर आणणं म्हणजे प्रगती नाही.
  • माणसाच्या हाताचं काम काढून घेतलं जात असेल तर ते यंत्र, वा तंत्रज्ञान वापरता कामा नये.
  • संगणकीय यंत्रणा वापरायला हरकत नाही पण मेमरी मधल्या सर्व तर्कमाला सर्वांच्या अभ्यासासाठी, सुधारणा करण्यासाठी खुल्या असायला हव्यात.
  • तयार होणारं यंत्र किमान २० वर्षं टिकायला हवं. मूळ किंमतीच्या १० टक्के खर्चात दुरुस्त करता यायला हवं.

 

समांतर समाजरचना

सम्यक तंत्रज्ञान हे एका नव्या समाजरचेना अविभाज्य भाग असेल. सम्यक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी एक मनोभूमिका रुजायला हवी. ही मनोभूमिका प्रगतीची नवी व्याख्या ठरवते.

माणसाची प्रगती म्हणजे काय हे असं ठरवता येतंः

आज एखाद्याची प्रगती झाली असं आपण केव्हा म्हणतो ? त्याची आर्थिक स्थिती सुधारली तर. त्यानं पैसा कोणत्या मार्गानं मिळवला हे आपण त्याला विचारत नाही. सम्यक तंत्रज्ञान ज्या समाजरचनेचा एक भाग असेल त्या समाजरचनेत प्रगतीचे मापदंडच वेगळे आहेत. कोणते ते सांगतो…

  • स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेता येणं हा मानसिक प्रगतीचा महत्वाचा भाग आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवताना मानवी भावनांचं आणि निसर्गाचं भान ठेवणं ही नैतिक प्रगती झाली. पृथ्वीवरचं माझं अस्तित्व म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार करणं हे अध्यात्मिक प्रगतीचं लक्षण समजलं पाहिजे. मन गुंतवणारी, प्रेमपूर्वक निर्मिती करणं म्हणजे कलानिर्मिती. माणसाचं इतरांसाठीचं ते योगदान असतं. ही एक वेगळीच प्रगती असते. प्रगतीच्या या वेगळ्याच मिती – dimensions या रचनेचा अविभाज्य भाग आहेत.
  • पण ही समाजरचना आर्थिक प्रगती कमी महत्वाची मानत नाही. पैसा म्हणजे आपण समाजाला काय दिलं त्याचं योग्य मोजमाप असतं हे तत्व या आर्थिक प्रगतीची व्याख्या ठरवतं.
  • माणूस म्हणजे केवळ भावना आणि पैसा नाही. त्याला शरीरही आहे. हे शरीर निरामय-निरोगी असावं अशी अपेक्षा ही समाज रचना करते. त्यासाठी औषधं हा केवळ संकटकाळचा मार्ग ठरतो. आरोग्य संभाळण्यासाठी क्रीडा, व्यायाम आणि रोजची कामं करण्यासाठीचे कष्ट हे सहज-मार्ग ठरतात. ही आरोग्य प्रगती. बागकाम करणं हा एक महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे व्यायाम आणि अन्न-उत्पादन ही दोन्ही कामं एकाच वेळी होतात.
  • स्पर्धा नव्हे सहकार्य हा या रचनेचा मूलमंत्र असेल. त्यामुळे लोकांमधे भावंडभाव वाढेल. हेवेदावे कमी होतील.

degrowth प्रक्रिया सम्यक तंत्रज्ञानाकडे नेईल.

नव्या समाजरचनेकडे जाण्याची प्रक्रिया देखील सम्यक तंत्रज्ञान फार महत्वाचं मानतं. वाढीचा दर कमी होणं degrowth हे या प्रक्रियेचं एक लक्षण आहे. आकडेवारी असं सांगते की गेल्या काही दशकांत ऊर्जेचा वापर सातत्यानं वाढतच गेला.
उत्पादित वस्तूंची संख्या देखील सतत वाढती राहिली.
मग त्या वस्तू खपवण्यासाठी खोट्या-नाट्या जाहिराती आल्या. अनैतिक मार्गांचा वापर करून वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारल्या गेल्या.
ते करताना या साऱ्याचं मूळ भांडवल जे इंधन तेच खाऊन टाकलं जात होतं.
निसर्गावरचा अन्याय सहन करत आपण काही मोजक्यांची गुलामगिरी केली.

या वाढीचा सतत कमी होणारा दर अंतिमतः शून्य वाढीकडे zero growth जातो आणि थांबतो. या पातळीवर आपण निसर्गाशी सलोखा करतो. आपण त्याचे स्वामी नाही तर त्याचा एक भाग आहोत हे मान्य करतो.

 

शून्य वाढीचा संकल्प जर सिद्धीला न्यायचा असेल तर उत्पादनांवर काही निर्बंध घातले पाहिजेत.

प्रचंड प्रमाणात वस्तूंचं उत्पादन

कोणत्याही वस्तू-सेवेचं प्रचंड प्रमाणात उत्पादन शक्य आहे. त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांचं वितरण कसं करायचं हा एकच प्रश्न शिल्लक आहे. असा समज सर्वसाधारण माणसांमधे प्रसारित केला गेला आहे. कदाचित हे शब्द वापरले गेले नसतील पण तशी वातावरण निर्मिती केली गेली आहे. हे काही प्रमाणात खरं आहे. पण मुळात ज्या पद्धती वापरून हे उत्पादन केलं गेलं, त्या माणसांवर, निसर्गावर अन्याय करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम घातक आहेत. समूहाची long term memory चांगली नसते. तो फक्त आजच्या सुखाचाच विचार करतो. म्हणून आपण हे अर्धसत्य बिनतक्रार स्वीकारलं आहे. यावर उपाय आहेत. पण त्यासाठी काही ध्येयं साध्य करावी लागतील–

  • कमी प्रमाणात वस्तूचं उत्पादन करणं परवडलं पाहिजे. त्यासाठीचं तंत्रज्ञान विकसित करणं आवश्यक आहे. ते इतरांपर्यंत पोचलंही पाहिजे.
  • सर्वसमावेशक सोयी देणाऱ्या वस्तू उत्पादित करण्याऐवजी dedicated use असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणं शक्य आणि फायदेशीर आहे.
  • वापरा दुरुस्त करा आणि वापरत रहा. हे तत्व प्रत्यक्षात आणायला लागेल.
  • वाढत्या लोकसंख्येला काम मिळावं म्हणून उत्पादनही वाढलं पाहिजे अशी विधानं केली जातात पण तो केवळ आभास आहे. वापरा दुरुस्त करा आणि वापरत रहा हा मंत्र आचरणात आणला तर दुरुस्तीच्या कामातून प्रचंड रोजगार निर्माण होईल आणि निसर्गरक्षणही होईल.

समारोप

हे एक संकल्पचित्र आहे. उद्याच्या सम्यक तंत्रज्ञानानं विकसित झालेल्या जगाचं. ही शब्दांची केवळ आतषबाजी ठरू नये. कारण यातल्या अनेक गोष्टी आपल्या सर्वांनाच जमणाऱ्या आहेत.
कृतिशून्यतेकडून कृतिशीलतेकडे आपला प्रवास मात्र त्यासाठी सुरू झाला पाहिजे. आत्तापासून…

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान. Bookmark the permalink.